बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सांगली: रोजची कामे आटोपली आणि रात्री घराचा दरवाजा लावून झोपलेली महिला कायमची गेली. सांगली जिल्ह्यातील भाटवडे (ता. वाळवा) येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मध्यरात्री कौलारू घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये भारती सुरेश पवार (वय 49) यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत रोख रक्कम, दागिने आणि संसारोपयोगी साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं घडलं काय?
भारती पवार या भाटवडे येथील राजारामबापू सांस्कृतिक भवनजवळ राहात होत्या. रोजची कामे आटोपून त्या शुक्रवारी रात्री घरात झोपल्या होत्या. मध्यरात्री दोनच्या सुमारास शेजारी राहणारे प्रभू गणपते बाहेर आले असता त्यांना पवार यांच्या घरातून धूर येताना दिसला. त्यांनी तत्काळ आसपासच्या नागरिकांना याबाबत माहिती दिली. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केलं होतं.
Weather Alert: पाऊस इज बॅक! महाराष्ट्रात धुमशान सुरू, रविवारी 24 जिल्ह्यांना अलर्ट
आग वाढत असल्याचे लक्षात येताच इस्लापूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला बोलावण्यात आले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी सापडलं होतं. घराला एकच दरवाजा असल्याने नागरिकांनी तो देखील उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यांना यश आलं नाही.
भारती पवार यांना घर जळत असताना बाहेरच येता आलं नाही. त्यामुळे त्यांचा आगीतच होरपळून मृत्यू झाला. भारती यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आहेत. या घटनेनं पवार कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.