स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी थेट जनतेत संवाद
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव शहरात स्मार्ट मीटरबाबत पसरलेल्या गैरसमजांना जोरदार उत्तर देत महावितरण विभागाने जनजागृतीची धडाकेबाज रॅली काढली. वीजबिल दुप्पट होणार, अशी अफवा पसरल्यामुळे ग्राहकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी मारेगाव विद्युत महावितरण कार्यालयाने थेट रस्त्यावर उतरून जनतेशी संवाद साधला.

महावितरणकडून बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या फायद्यासाठीच असून त्यातून वीज वापराची अचूक नोंद, पारदर्शक बिलिंग आणि वेळेवर माहिती उपलब्ध होणार आहे, असा स्पष्ट संदेश या पदसंचलनातून देण्यात आला. “स्मार्ट मीटर – ग्राहकांच्या हितासाठी”, “वेळेवर वीजबिल भरा, महावितरणला सहकार्य करा” अशा घोषणा देत रॅलीने शहरातील प्रमुख मार्ग दणाणून सोडले.
रॅलीदरम्यान माहिती फलकांच्या माध्यमातून स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये, त्याचे फायदे आणि गैरसमजांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे अनेक वीज ग्राहकांनी थांबून माहिती जाणून घेतली आणि शंका विचारत प्रतिसाद दिला.
उपकार्यकारी अभियंता श्यामसुंदर कुर्रा यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या पदसंचलनात कार्यालयीन कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शहरातील प्रमुख चौकांमधून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप महावितरण कार्यालयात करण्यात आला.

स्मार्ट मीटरविषयी निर्माण झालेल्या संभ्रमाला थेट उत्तर देत महावितरणने ‘जनतेशी संवाद, विश्वासाची हमी’ हा संदेश दिला असून या उपक्रमामुळे ग्राहकांमधील गैरसमज दूर होण्यास मोठी मदत होणार असल्याचे चित्र दिसून आले आहे.
