महाराष्ट्रावर,मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली. मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे,मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे.त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी लढावे लागणार.मुंबईत उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर निवडणूक लढण्याची होती,मनसे बाबत मात्र जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती अस वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. इंडिया आघाडी, मविआला धक्का नाही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मित्रपक्ष वेगवेगळे लढत असले तरी त्यामुळे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कोणताही धक्का बसणार नसल्याचाही दावा केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी होती,विधान सभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली नाही, आघाडीचे निर्णय हे स्थानिक पातळीवर असतात. यातून इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला धक्का लागला अस मानण्याचे कारण नाही. काँग्रेस हा पक्ष जातीयवाद, धर्मवाद करत नाही. काँग्रेस हा संविधान मानणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकासासाठी आमच्या पाठीशी जनतेने उभे रहावे असे आवाहन यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. हे ही वाचा… अखेर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा:’चुकाल तर संपाल’ म्हणत मुंबईला महाराष्ट्र, मराठी माणसांपासून तोडणाऱ्यांच्या राजकीय खात्म्याचा निर्धार
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील एका हॉटेलात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करून BMC निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या राजकीय खात्म्याचा निर्धार व्यक्त करत मुंबईतील मराठी माणसांना एकत्र येण्याचे आवाहन केले. दरम्यान, मुंबईसह राज्यभरातील ठाकरे घराण्याच्या चाहत्यांची राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची इच्छा होती. आज ही त्यांची इच्छा राजकीयदृष्ट्या पूर्ण झाली. या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहा ठाकरे बंधूंच्या युतीशी संबंधित संक्षिप्त राजकीय घडामोडी…
