बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच, अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपला मोठा घरचा आहेर मिळाला आहे. वॉर्ड क्रमांक ८२ मध्ये पक्षाने जुन्या निष्ठावंतांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या माजी नगरसेवकाला उमेदवारी दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायाविरुद्ध भाजपचे सक्रिय कार्यकर्ते दीपक जायसवाल यांनी बंड पुकारले असून, त्यांच्या पत्नी रुबी जायसवाल यांनी अपक्ष अर्ज दाखल करत, शड्डू ठोकला आहे. भाजपने अंधेरी वॉर्ड ८२ मधून काँग्रेसमधून आलेले माजी नगरसेवक जगदीश अमिन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमिन यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन या प्रभागात काम केले, त्यांना डावलून ‘बाहेरून’ आलेल्या नेत्याला तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याच संतापातून दीपक जायसवाल यांनी पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. ‘जिहाद मुक्त अंधेरी’चा आक्रमक नारा अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या रुबी जायसवाल आणि त्यांचे पती दीपक जायसवाल यांनी या निवडणुकीसाठी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या प्रचारासाठी ‘जिहाद मुक्त अंधेरी’ हा नारा दिला असून, याच मुद्द्यावर ते आता मतदारांसमोर जाणार आहेत. या प्रखर हिंदुत्वाच्या नाऱ्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक कार्याची भक्कम साथ दीपक जायसवाल, रुबी जायसवाल आणि त्यांचे सहकारी जयनारायण छोटेलाल तिवारी हे अंधेरी परिसरात केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही परिचित चेहरे आहेत. ‘वेलिफ सामाजिक संस्था’ (Velif Social Foundation) या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. या सामाजिक कार्याचा आणि जनसंपर्काचा फायदा त्यांना निवडणुकीत होईल, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. भाजपच्या गणितांना बसणार फटका? अंधेरीतील या बंडाचा थेट परिणाम भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या मतांवर होण्याची शक्यता आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्यास मतविभाजन अटळ असून, याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळू शकतो. पक्षश्रेष्ठी आता हे बंड शमवण्यात यशस्वी होतात की जायसवाल आपल्या भूमिकेवर ठाम राहतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.