बातमी ऐका (Marathi Voice Reader)
आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वाकयुद्ध आता शिगेला पोहोचले आहे. भारतीय जनता पक्षाने दिलेल्या ‘अबकी बार, 125 पार’ या नाऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते योगेश बहल यांनी भाजपवर अत्यंत जहाल भाषेत टीका केली आहे. “भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास आणि घमेंड नडल्याशिवाय राहणार नाही. जर भाजपने या निवडणुकीत 125 जागा जिंकल्या, तर मी राजकारण कायमचे सोडून देईन,” असे आव्हान बहल यांनी दिले आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना योगेश बहल यांनी भाजपच्या रणनीतीवर तोफ डागली. भाजपकडून विरोधकांच्या केवळ तीन जागा निवडून येतील, असा दावा केला जात आहे, मात्र प्रत्यक्षात भाजपला 100 चा आकडा गाठणेही कठीण जाईल, असे बहल यांनी म्हटले. भाजप सध्या सत्तेच्या माजात असून जनतेला गृहीत धरत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. EVM सेटिंग आणि फोडाफोडीचे गंभीर आरोप यावेळी बहल यांनी भाजपवर खळबळजनक आरोप करत निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “भाजपने ईव्हीएम मशीन सेट केल्या आहेत की नाही, हे मला ठाऊक नाही. पण, ते अन्य पक्षांतील नेत्यांना गळाला लावण्यासाठी ‘EVM सेटिंग’चे आमिष दाखवत आहेत. आमच्या पक्षात या, तुम्हाला ईव्हीएममध्ये दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील, असे भाजपचे नेते लोकांना सांगत आहेत.” योगेश बहल यांनी भाजपबद्दल केलेल्या या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार हेच शहराचे शिल्पकार पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधताना योगेश बहल म्हणाले की, जे लोक राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले आहेत, त्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही. “अजित पवार यांच्यासारखा उमदा नेता उभ्या महाराष्ट्रात मिळणार नाही. ते पिंपरी-चिंचवडचे खरे शिल्पकार आहेत, त्यांनीच या शहराचे नंदनवन केले आहे. एका आंधळ्या व्यक्तीला विचारले तरी तो सांगेल की अजित दादांनी या शहरासाठी काय केले आहे. त्यामुळे शहराची जनता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच बाजूने उभी राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘ब्लाईंड फेथ’ भाजपला महाग पडेल भाजपला सध्या स्वतःच्या ताकदीबद्दल ‘ब्लाईंड कॉन्फिडन्स’ आहे, मात्र मतदानाच्या दिवशी जनता त्यांना त्यांची खरी जागा दाखवून देईल, असा इशारा योगेश बहल यांनी दिला. भाजपच्या घमेंडीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तापालट निश्चित असून राष्ट्रवादी काँग्रेस बहुमताने सत्तेत येईल, असा दावाही बहल यांनी यावेळी केला.