वीजदर, अधिभार आणि सेवा गुणवत्तेबाबत ग्राहकांच्या नाराजीचा कडेलोट होत असतानाच महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महावितरणच्या पुनरावलोकन याचिकेवर पुन्हा विभागनिहाय जनसुनावण्यांची घोषणा केली आहे. ३ फेब्रुवारीपासून पहिल्या पंधरवड्यात राज्यातील सहा प्रमुख शहरांत ई-पब्लिक हियरिंगच्या माध्यमातून ग्राहकांना मते मांडण्याची संधी देण्यात येणार असली तरी वाढत्या बिलांमुळे त्रस्त नागरिक आणि उद्योग क्षेत्रातून आयोगाच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यापूर्वी गत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जनसुनावणी घेतली होती. त्यावर कोणताही निर्णय न घेता आता पुन्हा जनसुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे आयोगाचे माजी अध्यक्ष संजयकुमार यांनी सेवानिवृत्तीच्या तीन आठवडे अगोदर राजीनामा दिला. त्यांच्या जागी वल्सा नायर सिंह यांनी पदभार स्वीकारला आहे. महावितरणने ग्राहकांचे म्हणणे एकूण न घेताच नवीन वीज दरांबाबत पुनर्विचार प्रस्ताव सादर केला होता. वीज नियामक आयोगाने त्याला मंजुरी दिली. यामुळे वीज दर कमी न होता वाढले. जाचक अटींमुळे सौरऊर्जा ग्राहकांवर अन्याय झाला. याविरोधात राज्यभरातून वीज ग्राहक व त्यांच्या संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करून मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने वीज दरवाढीचा निर्णय रद्द केला. यावर सुप्रीम कोर्टात महावितरणने दाद मागितली होती. येथेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहिला. जनसुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर जनसुनावणी घेण्यात आली. आतापर्यंत वीज दरवाढीविरोधात १० हजारांहून अधिक ग्राहकांनी तक्रार केल्या आहेत. आयोगाकडेही आक्षेप नोंदवले आहेत. त्याची कोणतीच दखल न घेता आता पुन्हा जनसुनावणीचा घाट घातल्यामुळे ग्राहक, ग्राहक संघटना, तज्ज्ञांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून ग्राहकभिमुख निर्णय आयोग घेईल का? यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विभागनिहाय जनसुनावणी वेळ १०.३० नवी मुंबई : ठिकाण : कॉन्फरन्स हॉल, ७ वा मजला, सिडको भवन, सीबीडी बेलापूर : ३ फेब्रुवारी नाशिक : ठिकाण : नियोजन भवन, कलेक्टर ऑफिस कॅम्पस, जुना आग्रा रोड : ४ फेब्रुवारी छत्रपती संभाजीनगर : ठिकाण : एएससीआय, क्यूसीसी हॉल, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कार्यालय : ५ फेब्रुवारी पुणे : ठिकाण : अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृह ६ फेब्रुवारी अमरावती : ठिकाण : डीपीडीसी हॉल, अमरावती : ९ फेब्रुवारी नागपूर : ठिकाण : जिल्हा नियोजन समिती कार्यालय, सदर पोलिस ठाण्याजवळ : १० फेब्रुवारी पुन्हा जनसुनावणी म्हणजेच टाइमपास न्यायालयाने महावितरण व वीज नियामक आयोगाच्या मनमानी कारभाराला फटकारले आहे. आयोगाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जनसुनावणी घेतली. त्यामध्ये हजारो तक्रारी, आक्षेपांची नोंद झाली. यावर ग्राहकभिमुख निर्णय घेण्याऐवजी आता पुन्हा जनसुनावणी घेणे म्हणजेच टाइमपास आहे. दुसरे अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्याआधी व निकाल न देता पद सोडणे, ते स्वीकारणे व पुन्हा जनसुनावणी घेणे चुकीचे आहे., असे विलासचंद्र काबरा, अध्यक्ष, ऊर्जा सहयोगी संस्था यांनी म्हटले आहे. ई-जनसुनावणी होणार या जनसुनावण्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असून प्रत्येक केंद्रावर तांत्रिक सुविधा, ध्वनिचित्रफीत नोंद आणि सहायक कर्मचारी उपलब्ध राहणार आहेत. आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्राहक, संस्था आणि तज्ज्ञांना आपली मते, हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत, असेही सांगण्यात आले आहे. या सुनावण्यात काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.