‘त्या’ विमान कंपनीत अदृश्य हात, तपासात काही निष्पन्न होणार नाही:राऊतांचा दावा; राज्यसभेसाठीही एकत्रित उमेदवारीबाबत चर्चा

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला पंधरा दिवस उलटले आहेत; मात्र तपासाबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर संपूर्ण राज्य शोकाकुल झाले होते. पण हा अपघात होता की घातपात, याबाबत आता विविध पातळ्यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही मुद्द्यांसह सखोल, निष्पक्ष आणि कसून चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या मते, केवळ यंत्रणा काम करत आहेत, एवढे सांगणे पुरेसे नाही; सत्य बाहेर आले पाहिजे. अजित पवार यांच्या पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि नेतेही या मागणीशी सहमत असून तपासाची गती वाढवण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत ठाम आणि धक्कादायक दावा केला आहे. या अपघाताचा तपास होणार नाही, आणि झाला तरी त्यातून काहीही निष्कर्ष निघणार नाही, असे ते म्हणाले. रोहित पवार यांनी केलेल्या सादरीकरणातील मुद्द्यांवर शेवटपर्यंत स्पष्टता येणार नाही, असा आरोपही त्यांनी केला. या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. राऊत यांनी अजित पवार ज्या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, त्या कंपनीवरही संशय व्यक्त केला. त्यांच्या मते, त्या कंपनीत अदृश्य हात कार्यरत आहे. कंपनीमधील बेनामी गुंतवणूक आणि खरे मालक कोण, याचा आधी शोध घेतला पाहिजे. या आर्थिक व्यवहारांची चौकशी न झाल्यास सत्य समोर येणार नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या या आरोपांमुळे तपासाच्या दिशेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. घटनेचा तपशील पाहता, 28 जानेवारी रोजी अजित पवार काही सभांसाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी सुमारे 8.45 वाजता त्यांचे विमान बारामती विमानतळाजवळ आले आणि अचानक खाली कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला व विमानाला आग लागली. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह आणखी चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले; मात्र पंधरा दिवस उलटूनही तपासातून ठोस निष्कर्ष जाहीर झालेला नाही. लोकांच्या मनात खूप शंका आणि भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, कोणीही कोणाला लक्ष्य करत नाहीये; लोकांच्या मनात खूप शंका आणि भीती आहे. ज्या पद्धतीने अजित पवारांचा मृत्यू झाला, त्याला लोक अपघात म्हणायला तयार नाहीत. विरोधी पक्ष लक्ष्य करत नाहीयेत; ज्या कुटुंबाचा सदस्य अपघातात मरण पावला आहे त्या कुटुंबाला लक्ष्य करत आहे. त्या पक्षाचे सदस्य तुम्हाला लक्ष्य करत आहेत. तुमचे आमदार तुम्हाला लक्ष्य करत आहेत… तुम्ही त्यांना विचारायला हवे. राज्यसभेसाठी एकत्रित उमेदवारीबाबत चर्चा दरम्यान, या विषयावर बोलताना राऊत यांनी वेगळ्याच मुद्द्याकडे लक्ष वेधले. हा प्रश्न तुम्ही शरद पवार यांना का विचारला नाही? असा सवाल त्यांनी केला. शरद पवार हे अनुभवी आणि धुरंधर नेते असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीतील घडामोडींवरही भाष्य केले. त्यांच्या मते, आघाडीतील तीनही पक्षांचे काही सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभेसाठी एकत्रित उमेदवारीबाबत चर्चा होणार आहे. तिन्ही पक्षांचे नेते बसून याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात राऊत यांनी सांगितले की, त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली होती. त्यावेळी शरद पवार यांनी राज्यसभेची निवडणूक पुन्हा लढवण्याची तयारी दर्शवली आहे, असे राऊत म्हणाले. 60 वर्षांहून अधिक संसदीय अनुभव असलेले शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आपली भूमिका काँग्रेसलाही कळवली असल्याचे राऊत यांनी नमूद केले. त्यामुळे आता महाविकास आघाडीत या विषयावर सविस्तर चर्चा होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

Leave a Comment

error: Content is protected !!