मोटारसायकल चोरी प्रकरणात २ सराईत आरोपी जेरबंद
४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सागर मुडे | पांढरकवडा प्रतिनिधी
पांढरकवडा शहर व परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पांढरकवडा पोलीस स्टेशनने प्रभावी आणि धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान एकूण ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून सुमारे १ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत एकूण ४ मालमत्ता गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
रेकॉर्डवरील आरोपीकडून ३ गुन्हे उघड
पोलीस स्टेशन येथे दाखल अपराध क्र. २९३/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत नोंद असलेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी राजू लक्ष्मण मंचलवार (वय ३४, रा. इंदिरा नगर, पांढरकवडा) यास ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने संबंधित मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली. पुढील कसून चौकशीत त्याने आणखी दोन मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. पेट्रोल संपल्याने त्या अज्ञात ठिकाणी सोडून दिल्याची माहिती त्याने दिल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोन्ही दुचाकी हस्तगत केल्या.
या कारवाईत एकट्या आरोपीकडून ३ गुन्हे उघडकीस आले.
दुसरा आरोपी जेरबंद; चोरीची दुचाकी जप्त
यानंतर अपराध क्र. २७५/२०२६ अंतर्गत सुरू असलेल्या तपासात पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे विवेक अशोक चौधरी (वय ३४, रा. गणेशपूर वाई, ह.मु. आखाडा वार्ड, पांढरकवडा) यास अटक केली.
त्याच्या ताब्यातून MH29 BG 5927 क्रमांकाची अंदाजे ५९ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यामुळे संबंधित गुन्ह्याचाही उलगडा झाला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम
ही संपूर्ण कारवाई कुमार चिंता (पोलीस अधीक्षक, यवतमाळ), अशोक थोरात (अप्पर पोलीस अधीक्षक) व रॉबिन बन्सल (सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक लहूजी डी. तावरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील पोउपनि नितीन सुशीर, प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, सचिन काकडे, संदीप मडावी, सुनील राठोड व राजू मुत्यालवार यांनी विशेष परिश्रम घेत ही कारवाई यशस्वी केली.
शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांचा लगाम
पांढरकवडा पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात चोरीच्या घटनांना मोठा आळा बसणार असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा कडक नजर ठेवली जात असल्याचा ठोस संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
