महाशिवरात्रीनिमित्त ‘बेल’वृक्षारोपण व रोपवाटप
पांढरकवडा (प्रतिनिधी): सागर मुडे
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पांढरदेवी मंदिर परिसरात केवळ पूजा-अर्चनाच नव्हे, तर निसर्ग जपण्याचाही संदेश देण्यात आला. सामाजिक वनीकरण विभाग, यवतमाळ (वनपरिक्षेत्र वणी) आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे शास्त्रोक्त पद्धतीने ‘बेल’वृक्षारोपण करून भाविकांना बेलवृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. श्रद्धेला पर्यावरणाची जोड देणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भगवान शंकरांना बेल अत्यंत प्रिय असल्याने याच भावनेतून मंदिराचा परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) प्रणिता पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रिना पाटील, वनपाल माधुरी पडोळे व वनरक्षक उषा बोंडे यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून उपस्थितांना झाडांचे महत्त्व पटवून दिले. “केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे जिवंत मुलाप्रमाणे संगोपन करणे ही काळाची गरज आहे,” असे आवाहन यावेळी वन विभागातर्फे करण्यात आले.

भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मंदिरात दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांना बेलवृक्षांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीला बेलाच्या पानांचे विशेष महत्त्व असते, त्यामुळे प्रत्यक्ष रोप हाती मिळाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त करत ही झाडे घराच्या अंगणात जगवण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाला पांढरदेवी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य तसेच मंदिराचे पुजारी उपस्थित होते. राष्ट्रीय हरित सेनेच्या स्वयंसेवकांनी पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक वनीकरण विभागाने राबविलेल्या या ‘ग्रीन’ उपक्रमामुळे भक्ती आणि निसर्ग रक्षणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
