भोंदू खरात भक्तांवर कारवाई व्हायलाच हवी:तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात, पण त्याला टाचण्या मारण्याचे काम आमचे नाही – उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोंदू अशोक खरात व त्याला मानणाऱ्या सर्वांवरच कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपण महाराष्ट्र आणखी किती खालच्या पातळीवर नेणार आहोत. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा आहे. पण कायद्याचे पालन करणारेच भोंदूंच्या नादी लागणार असतील, तर भोंदू भक्तांवर कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणालेत. आम्ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेत आहोत. याऊलट तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात. पण लिंबाला टाचण्या मारण्याचे काम आमचे नाही, असेही ते यावेळी म्हणालेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स (FFFAI शिक्षण शाखा) ह्यांच्या संयुक्त सहकार्याने शिवसेना भवन येथे आजपासून सुरु करण्यात आलेल्या एक्स्पोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टीक्स कोर्सचे उद्घाटन उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. कस्टम क्लियरन्स, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स, वेअरहाऊसिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटबाबत स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षित करुन रोजगाराची हमखास संधी निर्माण करणे हा ह्या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी उपरोक्त विधान केले. लिंबाला टाचण्या मारण्याचे काम आमचे नाही उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही महाराष्ट्र आणखी किती खालच्या पातळीवर नेणार आहात. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे. पण कायद्याचे पालन करणारेच भोंदू बाबांच्या नादी लागणार असतील, तर त्यांच्या भोंदू भक्तांवर कारवाई झाली पाहिजे. असे झाले तर महाराष्ट्राला आधुनिक म्हणता येईल. आम्ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. याऊलट ते लिंबाच्या लागडीवर आलेत. पण लिंबाला टाचण्या मारण्याचे काम आमचे नाही. एपस्टीन फाईलवरून लक्ष हटवण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. या प्रकरणी अनेक फोटो व नावे समोर येत आहेत. याचा अर्थ लक्षात येतोय का? ज्यांचे कोणतेही कर्तृत्व नाही, त्यांना असे मार्ग अवलंबवावे लागतात. भाकड व भोंदू नेये यांचे कोणतेही कर्तृत्व नाही. जे लोक स्वकर्तृत्वाने काहीही करू शकत नाहीत, तेच लोक अशा भोंदूबाबांच्या नादी लागलेत. ‘ओम फट स्वाहा’ पत्रकारांनी यावेळी महाविकास आघाडीच्या काळातही भोंदू अशोक खरातला मदत झाल्याकडे उद्धव ठाकरेंचे लक्ष वेधले. त्यावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पांघरून मंत्रालय काढले पाहिजे. सर्वांच्या पापांवर पांघरून घालणारे हे खाते त्यांनी स्वतःकडे ठेवले पाहिजे. माझे काहीही म्हणणे नाही. तुम्ही सगळ्यांची चौकशी करा. कारण, पाणी कुठपर्यंत मुरलंय हे सर्वांना कळू द्या. या निमित्ताने गावोगावी असणाऱ्या भोंदूबाबांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा झेंडा असला तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे ते ‘ओम फट स्वाहा’ म्हणत म्हणाले. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपक्रमाचा उद्देश कस्टम क्लियरन्स, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स, वेअरहाऊसिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटबाबत स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षित करुन रोजगाराची हमखास संधी निर्माण करणे हा आहे. पाच आठवड्याच्या एक्स्पोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टीक्स कोर्सच्या माध्यमातून आजपासून सेनाभवन येथे पहिल्या 30 जणांच्या बॅचला प्रशिक्षित करण्यात येणार आहे. ह्यावेळी जेष्ठ शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते अंबादास दानवे आदी नेते उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!