विदर्भ एस.पी. न्यूजच्या बातमीचा जबरदस्त इम्पॅक्ट
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव, “अपघात झाल्यास जबाबदार कोण?” असा थेट आणि धारदार सवाल उपस्थित करणाऱ्या विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्कच्या वृत्ताचा अखेर जबरदस्त परिणाम दिसून आला असून, खापरी मार्गावरील जीवघेण्या रस्त्याच्या दुरुस्तीला प्रशासनाने उशिरा का होईना, पण सुरुवात केली आहे. मात्र, नागरिकांच्या संतापाचा उद्रेक आणि माध्यमांच्या धडाकेबाज पाठपुराव्यानंतरच यंत्रणा जागी झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मारेगाव तालुक्यातील खापरीकडे जाणारा रस्ता मागील काही दिवसांपासून अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनला होता. हटवांजरी मध्यान प्रकल्पाच्या पाईपलाईन कामासाठी जेसीबीद्वारे रस्त्याच्या मध्यभागी तीन ठिकाणी आडव्या नाल्या खोदण्यात आल्या. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने केवळ मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली आणि जबाबदारी झटकली. परिणामी, रस्त्यावर धोकादायक उंचवटे तयार होऊन वाहतुकीसाठी गंभीर संकट निर्माण झाले.

विशेषतः रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच भीषण बनली होती. कोणतेही इशारा फलक, प्रतिबंधक चिन्हे किंवा प्रकाशव्यवस्था नसल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत होता व चारचाकी वाहनांनाही धोका निर्माण झाला होता. संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, १७ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या धडाकेबाज वृत्तानंतर प्रशासनात खळबळ उडाली. अखेर २५ मार्च रोजी सायंकाळी संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत, खोदलेल्या नाल्यांवर काँक्रीट टाकण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे रस्ता पूर्ववत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सदर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असून,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणतेही खोदकाम केल्यानंतर तात्काळ दुरुस्ती व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे बंधनकारक असताना, संबंधित ठेकेदार व यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
एकीकडे माध्यमांच्या बातमीमुळे सकारात्मक बदल घडून आला असला, तरी नागरिकांच्या जीवाशी खेळ झाल्यानंतरच प्रशासन हलते, ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
