Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मुंढवा जमीन घोटाळ्यात ट्विस्ट!:पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शीतल तेजवानीला जामीन; रिमांड प्रक्रियेत आढळल्या गंभीर त्रुटी

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे नमूद करत जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी अटकेपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करताना अनेक चुका केल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेताना अटकेचे स्पष्ट कारण दिले नाही, तसेच पिंपरी येथील सेवा विकास बँक प्रकरणात अटकेपूर्वी दोन तास आधी माहिती देण्याचा नियमही पाळला गेला नाही. या त्रुटींवर न्यायालयाने ताशेरे ओढत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे अटक आणि त्यानंतरचे सर्व रिमांड आदेश बेकायदेशीर ठरवण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार, 16 डिसेंबर 2025 रोजी बावधन पोलीस ठाण्यातील CR No. 523/2025 अंतर्गत झालेली अटक आणि त्यानंतरचे रिमांड आदेश अवैध घोषित करण्यात आले. याचबरोबर पुढील सर्व ताबा आदेशही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे शीतल तेजवानीला तत्काळ मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, यासाठी 50,000 रुपयांचा वैयक्तिक जामीन (PR bond) आणि तितक्याच रकमेचे जामीनदार सादर करावे लागणार आहेत. या जामिनासोबत न्यायालयाने काही कठोर अटीही घातल्या आहेत. आरोपीने कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करायची नाही, साक्षीदारांना धमकी किंवा प्रलोभन द्यायचे नाही, तसेच तपास अधिकाऱ्यासमोर गरजेनुसार हजर राहणे बंधनकारक आहे. याशिवाय, न्यायालयात नियमित हजेरी लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, दुसऱ्या एका आदेशात 3 जानेवारी 2026 रोजी पिंपरी पोलिस ठाण्यातील CR No. 806/2019 अंतर्गत झालेली अटक आणि रिमांड प्रक्रियाही बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. या प्रकरणातही न्यायालयाने सर्व रिमांड आदेश रद्द करत आरोपीला जामिनावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठीही 50,000 रुपयांचा PR bond आणि तितक्याच रकमेचे जामीनदार देण्याची अट घालण्यात आली आहे. पोलिसांकडून इतका गंभीर हलगर्जीपणा कसा झाला? या संपूर्ण घडामोडीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे की, पोलिसांकडून इतका गंभीर हलगर्जीपणा कसा झाला? सुरुवातीपासूनच या प्रकरणातील तपासावर संशय व्यक्त केला जात होता. आता या त्रुटी जाणीवपूर्वक केल्या गेल्या का, यावरही चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, बावधन पोलिसांच्या या चुका तेजवानीसाठी फायदेशीर ठरल्या असल्या तरी, पुणे पोलिसांच्या इतर प्रकरणांमध्ये ती अद्याप अटकेत राहण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे पुढील कायदेशीर घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!