सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव आधीच संकटांच्या विळख्यात सापडलेल्या मारेगाव तालुक्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गोरज येथील 42 वर्षीय शेतकरी अविनाश लटारी पानघाटे यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
23 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. अविनाश पानघाटे हे कुटुंबासह शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या नावावर सुमारे 3 एकर शेती असून, शेतीसाठी घेतलेल्या बँक कर्जाचा ताणही त्यांच्यावर असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेच्या दिवशी कुटुंबीय वणी येथील लग्न समारंभातून परतले असता अविनाश घरी नसल्याचे लक्षात आले. वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने शेताकडे शोध मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान, वनोजा देवी शेतशिवारातील उत्तम दादाजी पानघाटे यांच्या शेतात बाभळीच्या झाडाजवळ अविनाश हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून पांढरा फेस येत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हा प्रकार पाहून कुटुंबीयांचा आक्रोश उसळला.
माहिती मिळताच मारेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे हलविण्यात आलाअसून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके व पोलीस कर्मचारी संभाजी लेंगुरे करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, सतत वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींकडे तातडीने लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
