तालुका काँग्रेस कमिटीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुर्दैवी परिस्थितीबाबत २२ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तहसिलदारांमार्फत शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वर्षी एल निनोमुळे महत्त्वाचा असलेला मृग नक्षत्रातील पावसाला विलंब होत असल्याने दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस कायम शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी अग्रेसर असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. तालुका काँग्रेसच्या निवेदनात शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या मांडल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे सर्व थकीत कर्ज विना अटी सरसकट माफ करावे. मागील वर्षीचा सोयाबीन, कापूस यांचा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा. दुष्काळासारख्या परिस्थितीत प्रभावित शेतकऱ्यांचे रेशनकार्ड तत्काळ सुरू करून त्यांना धान्य प्रदान करावे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पांढऱ्या (पांदण) रस्ते, विहीर आणि इतर सार्वजनिक कामे तत्काळ सुरू करावी. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा. शासनाच्या डीबीटी अंतर्गत अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना त्वरीत उपलब्ध करून द्यावेत. घरकुल योजनेचे थकीत हप्ते माफ/अदा करावेत. विद्युत मंडळाकडून ग्राहकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याची कारवाई केली जाऊ नये आदी इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदनाच्या आधारे त्वरीत भेट घेत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहन बनकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमेय घोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश गुल्हाने, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे, नगरसेवक अक्षय राऊत, प्रकाश नागतोडे, राजकुमार पत्रे, पांडुरंगजी लांडगे, प्रकाशचंद छाजेड, सुनील मते, भानुदास बावणे, भास्कर मुडावकर, अजय गावंडे, अतुल देशमुख, दिलीप मडावी, विनोद वाटमोडे, स्नेहल दिघाडे, प्रदीप नांदुरकर, अमोल कापसे, रमेश लोखंडे, मनमोहन भोयर, विपुल बोदडे उपस्थित होते.
