जनगणनेसाठी शिक्षकांची धावपळ; 1200 नागरिकांची स्व-गणना पूर्ण:दिग्रसमध्ये शिक्षकांची तळपत्या उन्हाने होतेय दमछाक‎

देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय उपक्रमांपैकी एक असलेल्या “जनगणना-२०२७”च्या पहिल्या टप्प्याला दिग्रस शहरासह ग्रामीण भागात वेग आला असून, उष्णतेत शिक्षक, पर्यवेक्षक आणि कर्मचारी अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. भर उन्हात घराघरांत जाऊन माहिती संकलन, घर क्रमांकन आणि नोंदणीचे काम सुरू असल्याने शिक्षकांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. उन्हाळी सुट्ट्या सुरू असतानाही जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच खासगी शाळा-महाविद्यालयांती ल शेकडो शिक्षक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जनगणना मोहिमेत पूर्ण क्षमतेने झटत आहेत. तीव्र उकाडा, वाढते तापमान आणि जीवघेण्या उन्हाच्या तडाख्यातही प्रगणकांचे काम अविरत सुरू आहे. १५ मेपासून देशभरात सुरू झालेल्या “जनगणना-२०२७”च्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक घराला क्रमांक देणे, घरांची यादी तयार करणे तसेच प्राथमिक माहिती संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. १५ ते १८ मेदरम्यान घर क्रमांकनाची प्रक्रिया राबविण्यात आली असून आता माहिती नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.देशाच्या इतिहासात प्रथमच ही जनगणना पूर्णपणे ऑनलाइन आणि पेपरलेस पद्धतीने होत असून यासाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यात येत आहे. या प्रक्रियेत नागरिकांना एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत. घराची स्थिती, शौचालय सुविधा, टीव्ही, सायकल, दुचाकी, चारचाकी, कुटुंबातील सदस्य संख्या यांसारखी माहिती संकलित केली जात आहे. प्रशासनाकडून ही सर्व माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दिग्रस शहराची अंदाजे लोकसंख्या ६० ते ६५ हजारांच्या दरम्यान असून शहरात १२ हजार निवासी व अनिवासी मालमत्ता असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना स्व-गणना बंधनकारक करण्यात आली असून आतापर्यंत शहरातील सुमारे १२०० नागरिकांनी स्वतःहून शासकीय संकेतस्थळावर माहिती भरून स्व-गणना पूर्ण केली आहे. दिग्रस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, उपमुख्याधिकारी अशोक सरकुंडे, जनगणना लिपिक योगेश दुधे, निकीतेश खडसे, प्रशिक्षक-पर्यवेक्षक मयूर दुधे व प्रभाकर भगत यांच्यासह १२ पर्यवेक्षक आणि ७५ प्रगणक भर उन्हात अहोरात्र मेहनत घेत आहेत. मोबाईलवरून माहिती नोंदवता येणार दिग्रस शहरात जनगणनेसाठी एकूण १२ मंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळात ५ ते ७ गट कार्यरत आहेत. प्रत्येक गटासाठी एक प्रगणक नेमण्यात आला असून, ६ ते ७ प्रगणकांमागे १ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आला आहे. शहरात एकूण ७५ प्रगणक आणि १२ पर्यवेक्षक हे काम पाहत आहेत. जनगणनेचा दुसरा आणि अंतिम टप्पा ९ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान राबवण्यात येणार असून या टप्प्यात प्रत्येक नागरिकाची सविस्तर माहिती मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदवण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!