पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या वतीने हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातींच्या वनस्पतींचे बिजारोपण करण्यात आले. यामध्ये लिंब, करंज, गुलमोहर, जांभूळ, सीताफळ, चिंच, बोर आदी वनस्पतींच्या बियांचा समावेश होता. या उपक्रमांतर्गत डोंगर परिसरात सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त बिजारोपण करण्यात आले. या बिजारोपण कार्यक्रमास महाविद्यालयाचे विश्वस्त कुणाल आव्हाड, प्रकाश दिवटे, पर्यवेक्षक प्रा. सलीम शेख, डॉ. अर्जुन केरकळ, डॉ. अशोक डोळस, डॉ. अभिमन्यू ढोरमारे, डॉ. विजय देशमुख, प्रा. विजय म्हस्के, प्रा. शरद बोडके, प्रा. शेखर ससाने, प्रा. सचिन शिरसाट, प्रा. सुधीर सुडके, प्रा. सचिन वनवे, प्रा. खंडेराव डोईफोडे, प्रा. अनिल नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बबन चौरे म्हणाले, जमिनीची धूप थांबवण्यासाठी वृक्ष अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. सध्या होत असलेल्या प्रचंड वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत चालला आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. पर्यावरणातील अनेक औषधी वनस्पती नष्ट होत असून वन्यजीवांचे प्रमाणही चिंताजनक रीतीने घटत आहे. पुढे बोलताना त्यांनी प्रदूषणासारख्या गंभीर समस्यांमुळे सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले. मानवी स्वास्थ्य टिकवून ठेवायचे असेल तर पर्यावरणाचे संवर्धन व संगोपन करणे अत्यंत आवश्यक असून, प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावून त्याची काळजी घेण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. या यशस्वी उपक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अरुण राख, डॉ. आनंद घोंगडे आणि एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे यांनी केले.