जिल्ह्यात 14.4 मिमी पावसाची नोंद:तीन मंडळांत अतिवृष्टी; वीज कोसळून तिघांचा मृत्यू‎, अखेर वरुणराजाची एन्ट्री; रात्रभर मुसळधार पाऊस‎

जून महिना अखेरच्या टप्प्यात पोहोचला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना सोमवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने मोठा दिलासा दिला. जिल्ह्यात अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळल्या. महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी १४.४ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. दारव्हा व नेर तालुक्यातील तीन महसुली मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. मात्र, या पावसाने दिलासा देतानाच मंगळवार, दि. २३ जून रोजी दोन कुटुंबांवर दु:खाचा डोंगरही कोसळला. वीज कोसळून उमरखेड, कळंब तालुक्यातील तीन युवकांचा मृत्यू झाला. भीमराव रामभाऊ लाठकर(५५), निखिल वाल्मिक भोयर(३२, दोघेही रा. उमरी, कळंब ) यांचा वीज पडू मृत्यू झाला. यंदा जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंतही अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. कपाशी, सोयाबीनसह इतर पिकांसाठी शेतकऱ्यांनी पूर्वतयारी पूर्ण केली होती; मात्र आकाशाने साथ न दिल्याने शेतीकामे थांबली होती. पावसाअभावी अनेक ठिकाणी शेतकरी हवालदिल झाले होते. अशा परिस्थितीत सोमवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या पावसामुळे जून महिन्यातील एकूण पर्जन्यमान ३८.३ मिमीपर्यंत पोहोचले आहे. अद्यापही हे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असले तरी दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत आणखी पाऊस झाल्यास खरीप हंगामाला गती मिळेल. जोरदार पावसामुळे शेतकरी बांधव सुखावला जिल्ह्यात आणि तालुक्यातील काही भागामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून, आता पेरणीच्या कामाला वेग आला आहे. डॉ. प्रमोद यादगीरवार, कृषी हवामान शास्त्रज्ञ फुलसावंगी | उमरखेड तालुक्यातील भोजूनगर येथे मंगळवार, दि. २३ जून रोजी दुपारी २.३० वाजता वीज कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. महेश गणेश आडे (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. माहितीनुसार, महेश आडे हा नेहमीप्रमाणे गावालगतच्या शेतात जनावरे चारण्यासाठी गेला होता. दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी तो जवळील झाडाखाली थांबला असता त्याचवेळी झाडावर वीज कोसळली. या घटनेत महेश गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. महेश हा कुटुंबाचा प्रमुख आधार होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, तीन बहिणी, अंध भाऊ असा परिवार आहे. मजुरी व गुराखीचे काम करीत होता. मान्सून नाही, द्रोणीय स्थितीमुळे पाऊस कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढे मान्सून सरकला नव्हता. आता मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अलनिनोचाही प्रभावामुळे मान्सूनसाठी कारणीभूत ठरला. सोमवारी झालेला पाऊस मान्सूनचा नव्हता. वातावरणातील उष्णता वाढल्याने द्रोणीय स्थिती निर्माण होते. त्यातून वादळी वारे व पाऊस होतो. असा पाऊस ठराविक ठिकाणीच पडतो. जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होण्यास २७ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पेरणी ७५ ते १०० मीमी पाऊस झाल्यानंतरच करावी. कमी कालावधीत येणाऱ्या बियाणांची निवड करावी. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी २३ ते २७ जूनदरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी व शेतीकामांचे नियोजन हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!