सौजना वाळू घाटावर जिल्हाधिकाऱ्यांची धाड

बाभुळगाव तालुक्यात सौजना वाळू घाटाचा लिलाव झाला नसतानाही त्या घाटातून उपसा करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी विकास मिना यांनी शुक्रवारी १८ जूनला सौजना वाळू घाटनावर धडक दिली. या वेळी त्यांच्या कारवाईची चाहुल लागल्याने तस्करांनी वाळूघाटावरुन पोबारा केला होता. त्यामुळे एक ट्रक जिल्हाधिकारी यांच्या हाती आला . जिल्ह्यात लिलाव केलेल्या वाळू घाटांची मुदत संपल्याने १० जूनपासून वाळू घाट बंदचे आदेश दिले आहे, असे असताना पाऊस लांबणीवर पडल्याने वाळू तस्कर उपसा करत आहे. त्यात पावसाअभावी कोरड्या नदीपात्रातून नव्हे तर कमी पाणी असलेल्या नदीपात्रात ट्रेझर बोट उतरवून वाळूचा उपसा करण्यात येत आहे. पावसाळ्यात मागणीनुसार वाळू देता यावी, यासाठी तस्करांनी वाळूचे साठे करण्यास सुरूवात केली. यासाठी जिल्ह्यात वाळू तस्करांवर कारवाईच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यातच बाभूळगाव तालुक्यातील सौजना हा वाळूघाट लिलाव न होताही वाळू तस्करांनी पोखरला. यासंदर्भात माहिती होताच जिल्हाधिकाऱ्यांनी येथे कारवाई केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांची कानउघडणी करीत हा प्रकार थांबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही तस्करी सुरूच असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी सौजना वाळू घाटावर धडक दिली. मात्र त्यांच्या वाहनाची चाहुल लागताच तस्करांनी पोबारा केला. या वेळी वाळूचा ट्रक ताब्यात घेतला. ट्रेझर बोट गेली दुसऱ्या किनाऱ्याला जिल्हाधिकारी सौजना वाळू घाटावर पोहोचले त्यावेळी त्या ठिकाणी ट्रेझर बोटीतून वाळू उपसा करण्यात येत होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन दिसताच ही ट्रेझर बोट तस्करांनी नदी पात्रातून नदीच्या दुसऱ्या कडेला वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत नेली. त्याचे चित्रीकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकाने केले. त्यामुळे सौजना वाळूघाटावर सुरू असलेला वाळू उपसा अधोरेखीत झाला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!