शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम देत आमदार भास्कर जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान “नार्वेकर कोण लागून गेला?” या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर बोलताना जाधव म्हणाले की, सतत हॉर्न वाजवणारी गाडी राहुल नार्वेकर यांची असल्याचा त्यांचा गैरसमज झाला होता. “माझ्या डोक्यात राहुल नार्वेकर होते. हॉर्नमुळे गोंधळ झाला आणि राहुल नार्वेकर समजून मी ते वक्तव्य केले. मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझा कोणताही वाद किंवा मतभेद नाही,” असे स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिले. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान भास्कर जाधव माध्यमांशी संवाद साधत असताना मिलिंद नार्वेकर यांच्या वाहनाचा हॉर्न वारंवार वाजल्याने जाधव संतापले. “नार्वेकर कोण लागून गेला? ही पद्धत बरोबर नाही. ते आमचे नेते असले म्हणून काय झालं?” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जाधवांच्या संतापानंतर मिलिंद नार्वेकरांचा टोला यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी ‘एक्स’वर हा व्हिडिओ शेअर करत उपरोधिक प्रतिक्रिया दिली. “माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
पावसाळी अधिवेशनास सुरुवात: विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. दुसरीकडे, विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या जात आहेत. वाचा लाइव्ह अपडेट्स
