मुंबईतील आणि देशातील सर्वसामान्यांचे हक्काचे रुग्णालय असलेल्या परळ येथील के.ई.एम. रुग्णालयाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेकडे पाठवलेल्या या प्रस्तावावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि सचिन अहिर यांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करताना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत सरकारला जाब विचारला. ते म्हणाले, “मुंबईत जेव्हा प्लेगची भीषण साथ आली होती, तेव्हा किंग एडवर्ड यांनी दिलेल्या निधीतून या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. मग किंग एडवर्ड या व्यक्तीवर सरकारचा इतका राग का आहे? ते काही अतिरेकी नव्हते की ज्यांच्या नावाचे रुग्णालय तातडीने बदलले पाहिजे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे नाव बदलून ‘कौशल्य एकलव्य मेमोरियल रुग्णालय’ असा प्रस्ताव दिला आहे. मग किंग एडवर्ड यांच्या नावाचा आणि त्यांच्या दातृत्वाचा मान सरकार कसा राखणार? हे नामांतर करण्याचा हा आटापिटा नेमका कशासाठी सुरू आहे?” असा सवाल मिलिंद नार्वेकर यांनी सरकारला केला. लोढांना हौस असेल तर ‘ट्रम्प टॉवर’चे नाव बदलावे – सचिन अणिरांचा टोला या चर्चेत सहभाग घेत ठाकरे गटाचे दुसरे आमदार सचिन अहिर यांनी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या व्यावसायिक पार्श्वभूमीवरून थेट निशाणा साधला. “पालकमंत्र्यांना जर नामांतराची इतकीच हौस असेल, तर त्यांनी त्यांच्या ‘ट्रम्प टॉवर’चे नाव बदलायला हवे होते, आम्ही त्याचे स्वागतच केले असते,” असा खोचक टोला अहिर यांनी लगावला. पुढे बोलताना अहिर म्हणाले की, सध्या के.ई.एम. रुग्णालयात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत. प्रशासनाने नाव बदलण्याऐवजी तिथल्या आरोग्य सुविधा सुधारण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ‘मार्ड’ सारख्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेही या नामांतराला तीव्र विरोध केला असल्याने सरकारने हा प्रस्ताव थेट फेटाळून लावावा, अशी मागणी त्यांनी केली. “एक फोन केला असता तरी…” – उदय सामंतांचा उपरोधिक टोला आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुरुवातीला उपरोधिक टोला लगावला. “नार्वेकरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चांगले संबंध आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही उत्तम सलोखा आहे. त्यांनी सभागृहात हा प्रश्न विचारण्याऐवजी थेट फोनवर संवाद साधला असता किंवा कालसारखे एखादे सुंदर ट्वीट केले असते, तरी हा प्रश्न सुटला असता,” असे सामंत म्हणाले. कायदेशीर आणि ऐतिहासिक तपासणीनंतरच निर्णय, सरकारची भूमिका अंतिम उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, किंग एडवर्ड यांच्या देणगीतूनच हे रुग्णालय उभे राहिले हे सत्य असून लोढा यांनी प्रस्ताव पाठवला होता हेही खरे आहे. मात्र, सरकार यावर कोणताही घाईगडबडीत निर्णय घेणार नाही. या प्रस्तावातील सर्व मुद्द्यांची कायदेशीर आणि ऐतिहासिक तपासणी केली जाईल. नाव बदलल्यास रुग्णालयाच्या अंतर्गत प्रशासकीय यंत्रणेवर काय परिणाम होईल, याचाही अभ्यास करावा लागणार आहे. के.ई.एम. च्या नामांतराच्या बाजूने आणि विरोधात अशी दोन्ही बाजूंची निवेदने सरकारकडे आली आहेत. त्यामुळे कोणतीही सामाजिक किंवा कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही, याची खात्री करूनच पुढील पाऊल उचलले जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. नावापेक्षा सेवा महत्त्वाची – प्रवीण दरेकर या गदारोळात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी रुग्णांच्या नातेवाइकांच्या दुरवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधले. “सध्या रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर झोपत आहेत. परळ परिसरात ४ ते ५ मोठी रुग्णालये आहेत, त्यामुळे तिथे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी राहण्याची योग्य सोय सरकारने करावी. सध्याच्या परिस्थितीत नावापेक्षा रुग्णांना मिळणारी सेवा आणि सुविधा जास्त महत्त्वाच्या आहेत,” अशी महत्त्वपूर्ण भूमिका दरेकर यांनी मांडली.
