हटवांजरी येथे स्व. वामन तुकाराम ठक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली कार्यक्रम; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: हटवांजरी येथील स्व. श्री. वामन तुकाराम ठक (माजी पोलीस पाटील) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी हटवांजरी येथे चौवदावीचा कार्यक्रम श्रद्धापूर्वक पार पडला. धार्मिक विधींसोबतच ग्रामगीतेच्या माध्यमातून जीवनाचे तत्त्वज्ञान, सत्कर्म आणि मानवी मूल्यांवर करण्यात आलेल्या प्रबोधनामुळे कार्यक्रमाला वैचारिक अधिष्ठान लाभले.

यावेळी श्रीमद्भागवत कथाकार, राष्ट्रीय कीर्तनकार व प्रबोधनकार ह. भ. प. सौ. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर (भद्रावतीकर) यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता मधील अध्याय २२ – ‘मृत्यू संस्कार’ याचे प्रभावी वाचन केले. मृत्यू हे जीवनाचे अटळ वास्तव असून, माणसाने आपल्या आयुष्यात सत्कर्म, सदाचार आणि समाजोपयोगी कार्याला प्राधान्य द्यावे, असा आशय त्यांच्या निरूपणातून मांडण्यात आला.
सुवर्णाताई पिंपळकर यांच्या ओजस्वी आणि विचारप्रवर्तक प्रबोधनामुळे उपस्थित भाविक व ग्रामस्थ अंतर्मुख झाले. मृत व्यक्तीच्या स्मृती केवळ आठवणीत न ठेवता त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सकारात्मक सामाजिक वाटचाल करण्याचा संदेश या प्रसंगी अधोरेखित झाला.

कार्यक्रमात पांडुरंग ठक महाराज तसेच देवराव शेंडे दादा यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्व. वामन तुकाराम ठक यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा स्मृतिपूर्वक गौरव केला. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना कुटुंबीय व उपस्थितांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण
स्व. वामन तुकाराम ठक यांच्या पावन स्मृतींना अभिवादन म्हणून ठक परिवारातील सदस्यांनी वृक्षारोपण केले. स्मृतीदिनाला पर्यावरण संवर्धनाशी जोडत कुटुंबीयांनी समाजापुढे सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश ठेवला. ‘स्मृती जपताना निसर्गही जपूया’ हा विचार या उपक्रमातून अधोरेखित झाला.
कार्यक्रमास ठक परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शेवटी स्व. श्री. वामन तुकाराम ठक यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.