नगारा येथील जि. प. शाळेला शिक्षक द्या; शाळा व्यवस्थापन समितीची मागणी

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील इंदिराग्राम (नगारा) येथील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची चिंता शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे. ५० विद्यार्थ्यांचा पट असलेल्या या शाळेत यापूर्वी दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र अलीकडे एक शिक्षक कमी करण्यात आल्याने सध्या केवळ एकाच शिक्षकावर शाळेचा संपूर्ण कारभार सुरू आहे.

एका शिक्षकावर मुख्याध्यापक पदाचा चार्ज, बी.एल.ओ.चे काम आणि ५० विद्यार्थ्यांचे अध्यापन करणे अशक्य असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक मार्गदर्शन मिळत नसल्याची बाब पालकांकडूनही उपस्थित करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील शेतमजूर व कष्टकरी पालक दिवसभर शेतात काम करतात आणि आपल्या मुलांना शिक्षकांच्या भरवशावर शाळेत पाठवतात. मात्र एकाच शिक्षकावर सर्व जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांकडे योग्य लक्ष दिले जाईल का, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

“आमच्या गरीबांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क नाही का?” असा थेट प्रश्न उपस्थित करत शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समिती मारेगावचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. नगारा शाळेत तातडीने अतिरिक्त शिक्षक नेमण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय नेहारे यांनी सांगितले की, शिक्षकसंख्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने याबाबत तात्काळ दखल घेऊन नगारा शाळेत पुन्हा एक शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी इंदिराग्राम (नगारा) येथील नागरिकांनी पंचायत समिती येथे निवेदन दिले असून, प्रशासनाच्या निर्णयाकडे परिसरातील पालकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!