शेतकऱ्यांच्या वेदना समजून त्यांना सामाजिक आधार देण्याची गरज:यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

प्रतिनिधी | आर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी लेखक विजयकुमार ठेंगेकर यांच्या समवेत ‘सावित्री: हरणार नाही… लढणार’ या शेतकरी आत्महत्येच्या गंभीर विषयावर आधारित कादंबरीचे प्रकाशन केले. हा प्रकाशन सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात झाला. या वेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की म्हणाले, यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्यांच्या समस्येमुळे संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत साहित्याच्या माध्यमातून समाजाला वास्तवाची जाणीव करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘सावित्री: हरणार नाही… लढणार’ ही कादंबरी केवळ एका कुटुंबाची कथा नसून, ती संघर्ष, जिद्द आणि आशेचा संदेश देणारी प्रेरणादायी कलाकृती आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांना मानसिक व सामाजिक आधार देण्याची गरज आहे. तसेच त्यांनी आर्णी पंचायत समिती येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले लेखक विजयकुमार ठेंगेकर यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक करत, ग्रामीण वास्तव आणि शेतकरी कुटुंबांच्या भावना प्रभावीपणे मांडल्याबद्दल अभिनंदन केले. लेखक विजयकुमार ठेंगेकर यांनी कादंबरीच्या लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, शेतकरी आत्महत्यांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांचे वास्तव समाजासमोर आणण्याचा आणि संघर्षातून उभारी घेण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या कादंबरीतून करण्यात आला आहे. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जालिंदर आभाळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) युवराज मेहत्रे व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या यशाबद्दलआर्णी पंचायत समिती येथे ग्रामपंचायत अधिकारीविजयकुमार ठेंगेकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आर्णी पं. स. चे ग्रा.पं. अधिकारी विजयकुमार ठेंगेकर यांच्या ‘सावित्री: हरणार नाही… लढणार’ कादंबरीचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते केले.

Leave a Comment

error: Content is protected !!