स्वर्गात तरी गद्दारी करू नको!:उद्धव ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचे शिवसैनिकांकडून सोलापुरात ‘श्राद्ध’; म्हणाले- नरकातही जागा मिळणार नाही!

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 6 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदेंच्या या ‘ऑपरेशन टायगर’मुळे राज्यभरात ठाकरे गटाचे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले आहेत. सोलापुरात तर संतप्त शिवसैनिकांनी या फुटीर खासदारांच्या नावाने थेट ‘दशक्रिया विधी’ (श्राद्ध) घालत आपला तीव्र संताप व्यक्त केला. सोलापुरात शिवसैनिकांचा उद्रेक, घातले खासदारांचे श्राद्ध पक्षाशी प्रतारणा केल्याच्या भावनेतून सोलापूरचे शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील गणपती घाट येथे एकत्र येत त्यांनी या सहा खासदारांचा तीव्र निषेध नोंदवला. या वेळी कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात या बंडखोर नेत्यांच्या विरोधात प्रतीकात्मक दशक्रिया विधी (श्राद्ध) पार पाडत जोरदार बोंब मारली आणि घोषणाबाजी केली. “नरकातही जागा मिळणार नाही…” बंडखोरांना शाप
या आंदोलनादरम्यान बंडखोर खासदारांवर अत्यंत तिखट शब्दांत प्रहार करण्यात आला. आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांच्या भावनांचा अक्षरशः बांध फुटला होता. आंदोलक शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत बंडखोरांना थेट शाप दिले: “स्वर्गात तरी सुखी राहा, तिकडे तरी गद्दारी करू नको, भाऊसाहेब वाकचौरे!” “ए संजय जाधव, तुला नरकातही जागा मिळणार नाही!” “ओमराजे निंबाळकर, अरं तुला कसं ओमराजे म्हणावं रे…” अशा आक्रमक आणि संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांकडून देण्यात आल्या. नेमके प्रकरण काय? (शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’) उद्धव ठाकरे गटाचे 6 प्रमुख खासदार— ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे समजते. हे सर्वजण लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असून, शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून या यशस्वी बंडाला ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले जात आहे. “कितीही गद्दार गेले तरी फरक पडणार नाही” – प्रताप चव्हाण दरम्यान, या आंदोलनापूर्वी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात ठाकरे गटातर्फे महाआरती करण्यात आली. या वेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “गेल्या ६० वर्षांपासून शिवसेना महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी अविरत लढत आहे. शिवसेनेची पाळेमुळे अत्यंत घट्ट आहेत. कितीही गद्दार पक्ष सोडून गेले, तरी पक्षाला आणि संघटनेला काडीमात्र फरक पडणार नाही. निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभा आहे.” संबंधित बातम्या… नाशिकमध्ये परतताच राजाभाऊ वाजेंचे जंगी स्वागत:म्हणाले- 100 कोटींच्या ऑफरची चर्चा, पण मी विचारांशी प्रामाणिक राहिलो; शिवसैनिकांनी केली पुष्पवृष्टी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना, ठाकरे गटासोबत राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत केले. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Comment

error: Content is protected !!