राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने दिलेल्या या धक्कादायक निकालामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, निंबाळकर कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. पुराव्याअभावी सर्व आरोपी सुटले
दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यामध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, साक्षीदार आणि पुरावे यांचा सखोल अभ्यास केला. सीबीआयने पद्मसिंह पाटील यांच्यावर हत्येची मुख्य सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार आरोपींना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत. पवनराजे हत्याकांडातील सीबीआय कोर्टाचे 10 सर्वात मोठे खुलासे, क्लिक करुन वाचा.. 20 वर्षांच्या कायदेशीर लढाईचा अंत
३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या राजकीय हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. या प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलिस आणि नंतर सीबीआयने तपास केला होता. खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाने आपल्या वडिलांच्या न्यायासाठी गेली २० वर्षे कायदेशीर लढा दिला. मात्र, आज न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष सोडल्यामुळे आता निंबाळकर कुटुंब या निकालावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे. कसली ही न्यायव्यवस्था? – अंबादास दानवे अंबादास दानवे म्हणाले की, पवनराजे निंबाळकर यांच्यासह एकाची राजकीय वैमनस्यातून निर्घृण हत्या होते आणि प्रकरणात ढीगभर पुरावे असतानाही आरोपी निर्दोष सुटतात. हा निकाल पाहून मनात संताप, चीड आणि अस्वस्थता याशिवाय काहीच उरत नाही. धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणातील आरोपी कोण आहेत हे माहीत आहे. तरीही न्याय मिळत नाही, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. अशा निकालांमुळे सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो. आज प्रश्न फक्त एका खटल्याचा नाही, तर न्यायाच्या आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते दानवे यांनी म्हटले आहे. हे ही वाचा
ऑपरेशन टायगर संकटात: ओमराजे म्हणाले – शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही, मतदारसंघात जावून चर्चा करून पुढचे ठरवणार! ‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर संकटात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. ‘भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास तो बरोबर आहे,’ असे समर्थनही त्यांनी केले होते. मात्र, आज पवनराजे हत्याकांडाचा निकाल येताच, त्यांनी या भूमिकेवरून यू टर्न घेतल्याचे दिसते. सविस्तर वाचा वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण?
3 जून 2006 रोजी राजकीय वैमनस्यातून पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सीबीआयच्या तपासानुसार, राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांनी 25 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली होती. या खटल्यात पद्मसिंह पाटील यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह 9 जण आरोपी आहेत. भावांचे सख्य ते कट्टर राजकीय विरोधक एकेकाळी धाराशिवच्या (तेव्हाचे उस्मानाबाद) राजकारणात ज्यांची जोडगोळी ‘राम-लक्ष्मणा’सारखी मानली जायची, त्याच चुलत भावांच्या नात्याचा शेवट इतका भीषण होईल, याची कल्पना कोणीही केली नव्हती. डॉ. पद्सिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातले सख्य राजकीय महत्त्वकांक्षेतून कट्टर विरोधकांमध्ये बदलले. डॉ. पद्मसिंह पाटील यांचा 2004 च्या विधानसभा निवडणुकीत अगदी निसटता विजय झाला. पुढे मंत्रिपद हुकले. या साऱ्या पार्श्वभूमीवर पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली. अर्थातच संशयाची सुई डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडे वळली. पवनराजेंना पद्मसिंहांनीच राजकारणात आणले पवनराजे यांना राजकारणाची पहिली पायरी चढवून देणारे त्यांचे मोठे बंधू डॉ. पद्मसिंह पाटीलच होते. त्यांच्यावर पाटलांचा इतका अढळ विश्वास होता की, मुंबईत मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या ‘रिमोट कंट्रोल’ची चावी आणि तेरणा साखर कारखान्याचं सर्वस्व पवनराजेंच्या हाती सोपवलं होतं. मात्र, याच सोपवलेल्या जबाबदारीतून पवनराजेंचे स्वतःचे एक स्वतंत्र वलय निर्माण झाले आणि इथूनच संघर्षाची पहिली ठिणगी पडली. राजकीय महत्त्वकांक्षेतून वाद विकोपाला दोघांमधील महत्त्वाकांक्षा इतकी टोकाला गेली की, सख्ख्या भावासारखे राहणारे हे नेते एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू बनले. 2004 च्या निवडणुकीत धाराशिवने रणसंग्राम पाहिला. निवडणुकीच्या दिवशी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या ‘त्या’ एका संशयास्पद बातमीने (ज्यामध्ये निंबाळकरांनी पाटलांना पाठिंबा दिल्याची अफवा होती) संपूर्ण वातावरण ढवळून काढलं. पाटलांचा विजय झाला खरा, पण त्या विजयाने त्यांची राजकीय चमक ओसरली होती. अल्पमताने मिळालेल्या विजयामुळे त्यांचं मंत्रिपदही गेलं आणि पराभवाचा हा राग मनात घर करून बसला. कळंबोलीचा परिसरात निर्घृण हत्या 3 जून 2006 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला काळा डाग लावणारा ठरला. नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात पवनराजेंची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं. निंबाळकर कुटुंबाच्या आक्रमक पवित्र्यामुळे हा तपास अखेर सीबीआयकडे गेला. तपासाची चक्रे फिरली आणि 2009 मध्ये थेट डॉ. पद्मसिंह पाटील यांना बेड्या ठोकल्या गेल्या. हजारेंनाही संपवण्यासाठी 30 लाखांची सुपारी दिल्याचा आरोप या प्रकरणात सर्वात मोठा गौप्यस्फोट झाला तो पारसमल जैन याच्या जबाबामुळे. केवळ पवनराजेच नव्हे, तर भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या अण्णा हजारेंनाही संपवण्यासाठी 30 लाखांची सुपारी दिली गेल्याचा खळबळजनक दावा सीबीआयने न्यायालयात केला. सत्तेच्या हव्यासापोटी एकाच रक्ताच्या दोन भावांमध्ये पडलेली दरी अखेर एकाच्या मृत्यूने आणि दुसऱ्याच्या अटकेने संपली. एका राजानेच आपल्या शिष्याला मोठं केलं आणि पुढे त्याच शिष्याने निर्माण केलेल्या आव्हानामुळे हे ‘कौटुंबिक युद्ध’ इतिहासातील सर्वात चर्चित हत्याकांड ठरलं.
