विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तरे देण्याचे अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेले स्पष्टीकरण अमान्य करत आदित्य ठाकरेंनी थेट विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार टाकत ‘वॉकआऊट’ (सभात्याग) केला. यानंतर सभागृहात मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना उत्तर दिले, तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उपस्थित राहून आदित्य ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार पलटवार केला. आदित्य ठाकरेंचा सभात्याग आणि ‘अकार्यक्षम’चा आरोप सभात्याग केल्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “या मिंधे सरकारमध्ये नवीन प्रथा सुरू झाली आहे. जे उपमुख्यमंत्री आहेत, ते एवढे अकार्यक्षम आहेत की त्यांना बाहेर पैशांचे आणि रात्रीचे खेळ जमतात, पण सभागृहात बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तरे देता येत नाहीत. त्यामुळेच ते इतर मंत्र्यांना आपला कार्यभार वाटून देतात.” “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दावा केला की २०१९ आणि २०२० मध्येही (महाविकास आघाडीच्या काळात) अशीच उत्तरे दिली गेली होती. मात्र, हे पूर्णपणे खोटे आहे. त्यावेळी कुणीही असा पळवाट काढला नव्हता, प्रत्येक मंत्र्याने पूर्ण जबाबदारीने प्रश्नांची उत्तरे दिली होती. अध्यक्षांनी खुर्चीवर बसून खोटे बोलू नये आणि आपले अगाध कायदेशीर ज्ञान पाजळू नये.” सभागृहात आदित्य ठाकरे विरुद्ध शंभूराज देसाई तत्पूर्वी, सभागृहात याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात मोठी खडाजंगी झाली. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, “अध्यक्षांनी २०१९ आणि २०२० चे रेकॉर्ड तपासावे. जर मंत्र्यांना उत्तरे देता येत नसतील, तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे.” यावर संतापून शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले, “सभागृहाचे कस्टोडिअन अध्यक्ष आहेत आणि त्यांनी नियमांनुसारच कामाचे वाटप केले आहे. २०१९ ते २०२२ या महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी (उद्धव ठाकरे) स्वतः सभागृहात किती उत्तरे दिली? तेव्हा तेही त्यांच्या मंत्र्यांना असे अधिकार देत होतेच. मग तुमच्या काळात जे चालले, ते आता का चालत नाही?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही पलटवार आदित्य ठाकरेंच्या वॉकआऊट आणि आरोपांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उभे राहून थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ६ खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले, “कालच त्यांना एक ‘जोर का झटका धीरे से’ लागला आहे, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणूनच ते फ्रस्ट्रेट (निराश) होऊन डेस्परेटली अशी स्टंटबाजी करत आहेत.” आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवत शिंदेंनी टोला लगावला, “ते आता सभागृहात नाहीत, नाहीतर मी त्यांना नक्की ऐकवले असते की, ‘कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा वाया गेलास तू!’” मंत्र्यांच्या उत्तरांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, “हे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी (सामूहिक जबाबदारी) आहे. राज्यमंत्र्यांना उत्तरे देताना जर काही अडचण आली, तर मी स्वतः तिथे हजर असतो. २०१९ ते २०२२ मध्ये महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) सभागृहात किती वेळ बसायचे आणि कोण उत्तरे द्यायचे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते,’ असा टोला त्यांनी लगावला.” शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांना कानपिचक्या उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे नेते जयंत पाटील आणि नाना पटोले यांनाही सुनावले. “तुम्ही पोरखेळ करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे आणि जनतेचे प्रश्न मांडा, सरकार प्रत्येक प्रश्नाला खंबीरपणे उत्तर देईल. अडीच वर्षांत आम्ही ४५ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली आहे, महायुती सरकार हे नेहमी जनतेच्या पाठीशी उभे आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरेंचा सभात्याग आणि त्यावरून सत्ताधारी नेत्यांनी दिलेले आक्रमक उत्तर यामुळे आगामी दिवसांतील अधिवेशन अधिकच वादळी आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधिमंडळाच्या कामकाजाशी संबंधित बातमी वाचा… पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:ड्रग्जची माहिती द्या, नाव गुप्त ठेवून बक्षीस मिळवा; अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी फडणवीसांची घोषणा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दुसरीकडे, विविध प्रलंबित मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असताना महायुती सरकारकडून महत्त्वाची विधेयके मांडली जाणार असल्याने आजचे कामकाज वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
