मृग नक्षत्राचे सुरुवातीचे १५ दिवस कोरडे गेल्याने चिंतेत बुडालेल्या बाभूळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. नक्षत्राच्या अगदी शेवटच्या दिवशी झालेल्या पहिल्याच दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्राने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले होते. दिवसेंदिवस उन्हाचा चटका आणि पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीची भीती व्यक्त होत होती. मात्र, मृग नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच २२ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता बऱ्याच अंशी कमी झाली आहे. आगामी काळात नियमित पाऊस पडेल, अशी आशा निर्माण झाली आहे. पहिला पाऊस पडताच शेतकऱ्यांनी कसलाही विलंब न करता शेतात धाव घेतली आहे. आतातरी निसर्ग साथ देईल, या विश्वासाने काही शेतकऱ्यांनी चक्क पेरणीला सुरुवातही केली आहे. त्यामुळे सध्या बाभूळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीकामांना प्रचंड वेग आला आहे. यंदा पावसाळ्याच्या ऋतूतील मृग नक्षत्राच्या अंतिम दिवशी का होईना, पण पाऊस आल्याने शेतकरी सुखावला आहे. आगामी काळात नियमित व आवश्यकतेनुसार पाऊस येण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहे. या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला लागलेल्या प्रथम नक्षत्रात म्हणजेच मृग नक्षत्रातील १५ दिवस उलटूनही पाऊस न आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले होते. परंतु मृग नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी दि. २२ जून रोजी रात्री १० वाजेदरम्यान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे. आतातरी चांगला पाऊस पडेल, या आशेने काही शेतकऱ्यांनी चक्क पेरणीला सुरुवातही केली आहे. या वर्षी सोयाबीन, मका, ज्वारी, तीळ यासारख्या पिकांसाठी सुरुवातीचा पाऊस खूप महत्त्वाचा होता. सुरुवातीला पाऊस न झाल्याने बीजारोपण उशिरा होण्याची भीती होती, खर्चात वाढ होते. पिकांचे संक्रमणाचे धोके निर्माण झाले होते. परंतु नुकताच आलेल्या पावसाने मातीतील ओलावा वाढवला आहे. सोयाबीन, मका लागवडीसाठी ही स्थिती अनुकूल मानली जात आहे. पिकांच्या वाढीसाठी आणि बिया अंकुरण्यासाठी ही पावसाची छोटी सुरवातही निर्णायक ठरू शकते. याविपरीत शेतकरी नेते, तज्ज्ञ यांनी सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सतत आणि पुरेसा पाऊस आला नाही, तर परिस्थिती पुन्हा चिंताजनक बनू शकते. त्यामुळे प्रशासनाने पाणी व्यवस्थापन, शेतकरी मदत व बियांचे पुरवठा, पीक विम्याची त्वरीत अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. पहिल्या पावसानंतर तत्काळ पेरणीला झाली सुरुवात पावसाळ्यापूर्वीच शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करून जमीन उत्पादनासाठी तयार करून घेतली. यासोबतच बी-बियाणे, खते सुद्धा घेऊन ठेवले होते. शिवाय हाताचे कामे बाजूला सारून शेतकरी कुठल्याही क्षणी पेरणी करण्यासाठी सज्ज झाला होता. परंतु पावसाची प्रतिक्षा करता दोन आठवडे उलटूनही पाऊस येत नसल्याने शेतकरी हताश झाला. मात्र काल रात्रीच्या रिमझिम पावसाने जमिनीत जेमतेम ओलावा येताच शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीस सुरुवात केली. पुढे कदाचित पाऊस उसंती देणार नाही, म्हणूनच पेरणीची लगबग दिसून येत आहे. कापूस, तूर, सोयाबीन उत्पादक शेतकरी अगदी लगबगीने पेरणी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.
