फेब्रुवारीत १७ प्रकरणे उघड; ७.५८ लाखांचा दंड वसूल
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव : तालुक्यात वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने जोरदार धडक कारवाई करत अक्षरशः ‘वीजचोरां’चा खेळ खल्लास केला आहे. फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल १७ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून संबंधितांकडून ७ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
महावितरणच्या विशेष पथकाने तालुक्यातील विविध गावांमध्ये अचानक धाडी टाकत अनधिकृत घरगुती वीज वापर, थेट लाईन घेणे, मीटरमध्ये छेडछाड, बेकायदेशीर जोडण्या आदी प्रकारांवर कठोर कारवाई केली. काही ठिकाणी शासनाचे आर्थिक नुकसान करून विजेचा सर्रास गैरवापर केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनधिकृत जोडण्या आणि जीवघेणे वायरिंगमुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. पुढील काळातही विशेष तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी महावितरणने दर्शविली आहे.
या धडाकेबाज कारवाईमुळे तालुक्यातील वीजचोरांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रामाणिक वीज ग्राहकांकडून समाधान व्यक्त होत आहे. “प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होऊ देणार नाही,” असा ठाम संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचे आवाहन
मारेगाव तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही अनधिकृत वीज वापर करू नये आणि स्वतःचा अमूल्य जीव धोक्यात घालू नये. “इमानदार ग्राहक वीजचोरी करणार नाही,” असे स्पष्ट मत श्यामसुंदर कुर्रा, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय मारेगाव यांनी व्यक्त केले.
तसेच सर्व ग्राहकांनी वीज बिलाचा वेळेवर भरणा करून कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन वीज वितरण कंपनी, मारेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महावितरणच्या या कारवाईमुळे तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण झाला असून पुढील काळातही ‘वीजचोरां’विरुद्ध मोहीम अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
